Wednesday, April 6, 2011

उपेक्षित इतिहाससंशोधकाची मुलाखत

......... तर गेल्या वेळी मी आमच्या इतिहास संशोधन पध्दतीचा परिचय करुन दिला होता. अर्थात त्याला वैचारिक दिशाभूल पध्दती म्हणणे योग्य होईल. ह्या वेळी थोडा दुसरा प्रसंग सांगणार आहे. मागच्या वेळी फक्त मनुवाद्यांच्या वाड्यात जावे लागले होते, ह्यावेळी प्रत्यक्ष एका प्रतिगामी इतिहास संशोधकाची भेट घ्यायची होती. खर तर आम्ही ह्याला इतिहास संशोधक अस म्हणत ही नाही, मिथकवादी, पुनरुज्जीवन वादी असे काही बाहि शब्द आम्ही वापरतो. अशा माणसाच्या घराची पायरी चढायची हि माझी इच्छा नव्हती..पण काय करणार? आमच्या लाल विद्यापीठातून आदेश आला, की भगवी ब्रिगेड इतिहासामध्ये नवीन काय अपप्रचार करणार आहे त्याचा आढावा घ्या.. म्हणे त्यांच्या राज्यातील अभ्यासक्रमात ते हा इतिहास लागू करणार आहेत. काही ही, पण तोपर्यंत आमच्या सिब्बलांनी एनसिआरटी चा अभ्यासक्रम राज्यांच्या गळ्यात मारलाच. बघा अगदी थोड्याच दिवसात महाराष्टातील बहुतेक शाळातुन (ज्या आता इंग्रजी माध्यमाच्या आहेत) शिवछत्रपतिंच्या इतिहासाऐवजी, मोगलांचा इतिहास शिकवायला सुरुवात होईल. मराठ्यांच्या इतिहासाला कोपर्‍यात ढकल्यण्यात आले असेल....
असो..विषयांतराची खोड काही जात नाही. मी त्या इतिहास संशोधकाच्या घरी गेलो. घर तसे जुनेच होते, हा मनुष्य साधारण ८० ला टेकला असेल(आमच्या लाल टोळी विरोधात लढायची चांगली हिम्मत आहे ह्या वयात). साधारण परिचय झाल्या नंतर मी मुलाखत सुरु केली.
आपल्याला विचारवंत संशोधकाचा दर्जा देत नाहीत ह्या बाबत खंत वाटते का ?
जे स्वतः राजकीय प्रचारक आहेत त्यांनी दुसरा संशोधक आहे का नाही हे ठरवणे हा विनोद होईल. अज्ञाताचा शोध घेणे हे संशोधकाचे काम आहे. हे धार्मिक आहे, हे पौराणिक आहे म्हणून झिडकारणे बुध्दिमंताचे लक्षण नव्हे.
आपल्याला अनेकांनी पौराणिक कथाकार म्हणून हिणवले आहे ?
का... मी पौराणिक संदर्भ वापरले म्हणून ? पाश्चात्यांचा इतिहास इ.स. पू ४००० पासुन सुरु होतो म्हणून आपलाही तेव्हाच व्हायला पाहिजे असा थोडाच नियम आहे. पुराणे हा इतिहासच आहे, फक्त हजारो व लाखो वर्षांचा ! उत्क्रांतिवाद व आधुनिक विज्ञानवाद्यांच्या अपप्रचाराला भुलुन आपण आपला विश्वास का सोडायचा? पुराणात हजारो वर्षांच्या राजांच्या वंशावळी आहेत, त्यांनी केलेल्या महान युध्दांच्या कहाण्या आहेत . निव्वळ चमत्कार आहेत म्हणून पुराणे नाकारणे मला पटत नाही . हा निव्वळ मतलबीपणा आहे. चमत्कार आजच्या विज्ञानाच्या सामर्थ्याबाहेर आहेत म्हणून पूर्वी ही ते नव्हते म्हणणे हा ढोंगी पणा आहे.
पुराणातील गोष्टींना पुरातत्वीय पुरावे मिळत नाही त्याचे काय??
शोधले तर मिळतात. पण ज्यांना राजकीय सोईसाठी शोधायचेच नाहीयेय त्यांना कसे मिळणार ? द्वारके बद्द्ल मिळाले नाहीत ? सरस्वती नदी सापडली नाही ? अयोध्येत मिळाले नाहीत ? ... एक लक्षात घ्या जिथे आपली प्राचीन शहरे होती तिथेच नवी शहरे ही आहेत. दिल्ली, काशी,अयोध्या,मथुरा हजारो वर्षांपासुन त्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे तिथे उत्खनन अशक्य आहे...ट्रॉय सापडले कारण ते कधीच जमीनदोस्त झाले होते, रोमच्या पम्पाचे ही तसेच . शिवाय आपल्या इथे मोठ्या नद्या आहेत ज्यांना दर वर्षी महापूर येतात. अशा परिस्थित अवशेष मिळण्याची शकयता कमी होते. महाभारताचे युध्द झाले तो तर अत्यंत सुपीक प्रदेश आहे. इथे असंख्य मातीचे थर साचले असतील. फुटक्या मडक्यांपेक्षा , आपल्याकडे तयार इतिहास आहे त्याच अभ्यास करा ना !!
पण सगळे संशोधक पक्षपाती आहेत असा आपला दावा का ? अगदी पाश्चात्य ही?
पाश्चात्य संशोधकांचा हेतुच मूळात इथल्या संस्कृतीचे खच्चीकरण करण्याचा होता. शिवाय त्यांचे हिंदु धर्माचे आकलन कमी असल्यामुळे ही त्यांचे बरेच गैरसमज झाले. तुम्हाला दिसेल , एकाच काळात एवढे ब्रिटीश, जर्मन प्राच्यविद्या संशोधक का झाले ? त्यांचा ब्रिटिश शासनाला भारतीयांना समजण्यात व त्यांना अपेक्षित सामाजिक बदल करण्यात उपयोग होत होता म्हणून ! सध्या बघा..... ओक्सफर्ड मध्ये संस्कृत विषय निधी अभावी बंद करण्यात आला आहे. इतर विद्यापीठे ही त्याच मार्गावर आहेत. जर्मनीतील एका विद्यापीठात गेले १५० हुन अधिक वर्षे संस्कृत शिकवले जात होते ते आता बंद होईल. कारण सोपे आहे , त्यांचा उद्देश संपला आहे. भारत कधीच अँग्लो-इंडियन बनला आहे.
आपण विशिष्ट राजकीय प्रणालीशी निगडीत आहात हा आपल्यावर आरोप आहे?
ज्यांना पुराणे,वेद,रामायण, महाभारत ह्या शब्दांची अ‍ॅलर्जी आहे ते असा आरोप करतात. ताजमहाल विषयी इतक्या जणांनी पुस्तके लिहीली. कधी शासनाला वाटले संशोधन करावे म्हणून की शहाजानने खरच ताजमहाल बांधला का ह्याचे ! उलट शासन तिथे नमाजाला परवानगी देउन त्यावर विशिष्ट समाजाचा दावा मान्य करते. पुरातत्वीय विभागाच्या हातात इतकी वर्षे ताजमहाल राहिला आहे , की मंदिराच्या बाजुच्या पुराव्यांची त्यांनी केव्हाच वासलात लावली असेल. अशी २०,००० मंदिरे आहेत. एका मंदिरासाठी ६० वर्षे केस चालते. ह्यावर काय बोलणार.........
पण इतिहास शास्त्राची एक शिस्त असतेच ना ???
शास्त्र म्हणून तुम्ही स्वतःच्या विचारसरणीला सोईस्कर नियम बनवणार. व आम्हाला अशास्त्रीय म्हणणार. पौराणिक निकष जाउ द्या, अ‍ॅस्ट्रोनोमिचे निकष तरी मान्य करा. जे तुम्ही मेक्सिकन, इजिप्शियन इतिहासाच्यासाठी मान्य करता, पण वेदांचा , महाभारताचा काळ ठरवताना मात्र नाकरता हा पक्षपात नव्हे काय ? आधी काल्पनिक थेअरी बनवायच्या व त्या थेअरींना अंतिम सत्य समजुन सगळा इतिहासच त्यावर रचायच्या. उदा: आर्यांचे आक्रमण, आर्य-द्रविड संघर्ष ! ह्यांचा दुसरा आवडता सिध्दान्त म्हणजे पुराणांमध्ये कायम नवीन भर पडत आली हा ! भांडारकर संशोधन संस्थेने महाभारताची संशोधित आवृत्ती प्रसिध्द केली. काही प्रतीत भाग मुद्दामुन कापला असण्याची किंवा लुप्त झाला असण्याची ही शक्यता होती. सगळ्यात कमी मजकुर असलेली प्रत अधिक प्राचीन हा काय निकष झाला ??? कृष्णाच्या अवतारत्वाविषयी अनेकांना आकस असल्याने, त्याचा अवतार कल्पित ठरवुन हा ह्या संशोधकांनी गुप्त कालखंडातील भर ठरवली. नास्तिकतेने मने ग्रस्त झाल्याने दुसरी अपेक्षाच नव्हती.
.................मी अधिक काळ थांबू शकलो नाही. हे सर्व प्रताप मला पूर्ण विदित असल्यामुळे, थोडिशी का होईना मलाच लाज वाटली (अजुन घरी गणपती बसवत असल्याचा ही हा परिणाम असावा),,,,,,,व त्या पुनरुज्जीवन वाद्याच्या घरातुन मी लगेचच सटकलो............

मुलाखत जरी काल्पनिक असली तरी आशय खरा आहे...

काही संदर्भ
हिन्दु टेम्पल्स-व्हाट ह्यपन्ड टू देम ?------------राम स्वरुप

No comments:

Post a Comment